गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet) PatraBhet
-
- Religion & Spirituality
-
परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या विचारपुष्पांची गुंफण म्हणजे गुरुप्रबोध नवनीत. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत विविध विषयांवरती पू. सद्गुरुदास महाराज यांनी मांडलेले विचार या माध्यमातून आपल्या थेट हृदयास भिडतात. अध्यात्माचा खरा अर्थ उलगडणारी ही पॉडकास्ट मालिका त्यातील विचारांच्या माध्यमातून आपल्या जीवनास नवा आशय देईल, यात शंका नाही.
-
उत्कट भव्य तेचि घ्यावे...
उत्कट भव्य तेचि घ्यावे, मळमळीत अवघेचि टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे...भूमंडळी ! समर्थांचे हे शब्द दासबोधातून आपणास भेटतात. दासबोध आपल्या जीवनात कसा उतरेल, याची काळजी घेण्यासाठी उत्कटत्वाने दासबोधाला जाणून घेणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने १९८९ मध्ये दासबोध अभ्यासकांच्या शिबिरात प.पू. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन आपणास समर्थांच्या आणखी समिप आणतं... मनात भक्ती नि भव्यतेची आस पेरतं.
-
आळस, आशा नि आसक्ती!
साधकांच्या आयुष्यात शिबिरांचं अत्यंत महत्त्व असतं. कारण, शिणलेलं मन आणि बिघडलेला मेंदू रस्त्यावर आणण्याचं काम शिबिरं करतात. आळस, आशा अन् आसक्ती ही त्रिसूत्री, ते कधी सोडावे अन् कधी अंगिकारावे याविषयी अकोला येथील शिबिरात प.पू. श्री. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन कानात प्राण आणून ऐकावं असंच आहे. चला तर ऐकुया, महाराजांच्या शब्दांत याविषयीचे मार्गदर्शन...
-
उपासनेचे महत्त्व
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात उपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ही उपासना म्हणजे नेमकी काय असते, उपासना का करावी, कशी करावी, त्यासाठी मन एकाग्र कसे करावे, उपासनेचे अंतरंग अन् बहिर्रंग कसे असतात, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दांत दिलेली आहेत. ऐकावे अन् मनात रुजवावे असे हे शाश्वत चिंतन ऐका आणि इतरांपर्यंत पोहोचवा.
-
आजचा अंधार, उद्याच्या प्रकाशाची ग्वाही!
आज प्रजासत्ताक दिन. त्यानिमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा. कोणत्याही राष्ट्राच्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाचा वाटा असतो शिक्षणाचा. आजच्या शिक्षणपद्धतीवर तुम्ही पूर्ण समाधानी आहात का,असा प्रश्न विचारला तर बहुतेक लोकांचे उत्तर नकारार्थी असते. मग, कोणती शिक्षण पद्धती आपले समाधान करू शकते, यावर पूज्य सद्गुरुदास महाराज जेव्हा मार्गदर्शन करतात, तेव्हा ते चिंतन मनातील विचारांना अधिक प्रगल्भ करते...हे विचारांचे अनमोल धन मनात जपा आणि मनोमनी पोहोचावा...ही देखील देशाच्या प्रगतीसाठी आपले मोलाचे योगदान ठरू शकते.
-
मकर संक्रांति
मकर संक्रांतीच्या पर्वाचे महत्त्व काय आहे, त्याचा अन् सूर्योपासनेचा काय आणि कसा संबंध आहे, संक्रमणकाळात दानाचे महत्त्व का आहे या आणि अशा अनेक बाबींची उलगड केली आहे, प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी. मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर प्रत्येकाने ऐकायलाच हवे आणि इतरांनाही ऐकवायला हवे असे हे पवित्र विचारांचे तिळगूळ.... त्याचे सेवन करा आणि आयुष्यातील नवसंक्रमणाचे सस्मित स्वागत करा.
-
सदा स्मरावे जिजाऊ नाम...
जि म्हणजे जिवंतपणा. जा म्हणजे जागेपणा. बा म्हणजे बाणेदारपणा. ई म्हणजे ईश्वरार्पण वृत्ती. असा गुणसमुच्चय असणारी माता म्हणजे राजमाता जिजाबाई, अशा शब्दांत सद्गुरुदास महाराज जिजाऊ मासाहेबांचं यथार्थ वर्णन करतात. पौष शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच राजमाता जिजाऊंची जयंती. ही तिथी संशोधित करण्याचं महान कार्य प.पू. सद्गुरुदास महाराज (म्हणजेच पूर्वाश्रमीचे शिवकथाकार विजयराव देशमुख) यांनी केलं. आठ वर्षे अविरत संशोधन करुन त्यांनी ही तिथी शोधून काढली आणि त्याची नोंद आपणास शककर्ते शिवराय या त्यांच्या द्विखंडात्मक शिवचरित्रामध्ये पाहावयास मिळते. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच, १२ जानेवारी १५९८ ही तिथी इतिहासकारांबरोबर सरकारनेही मान्य केली. म्हणून, ७,८ व ९ जानेवारी १९८२ मध्ये सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्मोत्सव श्री सद्गुरुदास महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. अभूतपूर्व अशा या उत्सवानंतर दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव इथे साजरा होतो आहे. आजचा पॉडकास्ट मातोश्री जिजाऊंच्या समर्पित. त्यांच्याविषयी सद्गुरुदास महाराजांनी सांगितलेला शब्द नि शब्द श्रद्धापूर्वक ऐकावा, मनात कायम साठवून ठेवावा आणि त्यातून फुलणारी प्रेरणा मनोमनी जागवावी.