अक्षरभान-निकिता भागवत

Maau & Bunny show by Arnav Bhagwat

जगताना आवश्यक असलेल्या दृष्टिकोनाला एक पूरक कोण देण्याचा प्रयत्न. जगण्याच्या सोहळ्याला एक 'अक्षर'भान यावं म्हणून....

Episodes

  1. 04/18/2021

    #अक्षरभान- प्रमाणामध्ये : निकिता भागवत

    प्रमाणामध्ये मंडळी गेल्या आठवड्यात आपण 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला तेव्हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला. मराठी भाषेचा विचार करताना, दहा कोसांवर बदलत जाणारी मराठी हा अभिमानाचा विषय असला तरी सुद्धा; प्रमाण मराठी भाषेबद्दल वाढत असलेला अनादर ही एक चिंताजनक बाब भाषेच्या दृष्टीने आहे. मराठी भाषा बोलींची माध्यमातून वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये बहरतेच आहे, परंतु सगळ्यांची सर्वसमावेशक सर्वसामायिक अशी एक भाषा असणं राजकीय आणि कार्यालयीन दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने प्रमाणभाषा असणं सर्व राज्यांना अनिवार्य झालं आहे. एकाच शब्दाला विविध बोलीभाषांमध्ये असलेले विविध प्रतिशब्द बघता प्रमाणभाषेची गरज अधिकच प्रमाणित होते आणि मग प्रमाण भाषेचं महत्त्व पटू लागत. विविध भाषा आणि त्यांच्या बोली भाषा हे आपल्या देशाचं वैभव आहे, त्यांची समृद्धी आहे पण त्यांचं महत्त्व मान्य करत असताना प्रमाण भाषेतले नियम प्रमाण भाषेतल्या तांत्रिक गोष्टी न मांडण्याचा अट्टाहास अलीकडे अनेक जण करताना दिसून येतात. हे मात्र होता कामा नये. प्रमाण मराठी भाषा ही या सगळ्यांच्या जडणघडणीचा परमोच्च बिंदू आहे असं मला नेहमी वाटतं. राज्याच्या भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रमाण भाषेचं महत्त्व खूप जास्त अधोरेखित होतं. एकाच शब्दाला बोलीभाषांमध्ये असलेले विविध प्रतिशब्द मराठी शब्दाला दूर नेऊ शकतात. त्यामुळे ज्याला मराठी शिकायचे आहे त्याच्यासाठी प्रमाणभाषा अत्यंत गरजेची आहे. समजा मुलगा किंवा मुलगी हा शब्द आपण घेतला तर महाराष्ट्राच्या विविध बोलीभाषांमध्ये वेगवेगळे शब्द उदाहरणार्थ कोकणी- मालवणी भाषेत चेडवा गोव्याच्या कडच्या कोकणी भाषेत झील असा शब्द आहे. अहिराणी भाषेत मुलाला अंडोर तर मुलीला अंडेर असा शब्द आहे. आदिवासी भाषांमध्ये आणखीनच वेगळे शब्द आहेत. मग मराठी भाषा शिकत असताना काही तरी एक प्रमाण मानावंच लागेल. मुलगा आणि मुलगी हे प्रमाण भाषेतले शब्द आपल्याला मान्य करावेच लागतील. क्रियापदाच्या संबंधातही अनेक लोक असे प्रश्न उपस्थित करतात की, प्रमाण भाषाच काम आणायची बोलीभाषांमधले शब्दही मान्य केले गेले पाहिजे, आपण प्रमाणभाषेचा विचार केला तर मी बाहेरगावी चालले असा शब्दप्रयोग प्रमाणभाषेत केला जातो हेच वाक्य विदर्भाच्या परिसरात ' मी बाहेर चालली' असं म्हटलं जातं. अहिराणी असलेल्या प्रदेशांमध्ये हेच वाक्य मी बाहेर जाऊन राहिली अशा पद्धतीने बोलण्याची प्रथा आहे. असं समजू या की एखादा परदेशी नागरिक अथवा परराज्यात ला नागरिक आपली मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने काय प्रमाण मानावं? 'जाऊन राहिली आहे',? 'चालली आहे ? प्रमाण भाषा अत्यंत गरजेची आहे. या गोष्टीला 'आक्षेप घेणाऱ्यांचं खरंच आश्चर्य वाटतं मला! कधीकधी एक कविताही यानिमित्ताने आठवते. 'प्रमाणामध्ये सर्वकाही असावे' तो संदर्भ वेगळा असला तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीला प्रमाण ठरलेलं असतं आणि प्रमाणामध्ये सगळं काही असलं तर आयुष्य नीट चालतं. अन्नसाखळी बघितली तरीही आपल्याला हे निश्‍चितपणे लक्षात येतं. तिथला एक घटक मोठा झाला आणि एक अस्तित्वहीन झाला तर ती अन्नसाखळी नष्ट होते त्यामुळेच एकूणच त्या परिसंस्थेला धोका पोचायला वेळ लागत नाही. भाषेचंही तसंच आहे असं मला वाटतं. भाषेत सांगितलेले प्रमाण शब्द हे समजा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी बोली असलेल्या प्रदेशातल्या लोकांनी वापरले तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच प्रमाणभाषा ही कठीण वाटली, क्लिष्ट वाटली, फारच नियमबद्ध वाटली तरीही ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. भाषेत वाक्यरचना जशी महत्त्वाची असते तसाच विरामचिन्हांचा उपयोगही आत्यंतिक महत्त्वाचा असतो. चुकलं तर अर्थाचा अनर्थ काय होतो अनेक वेळेला आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यावरून वेगवेगळे विनोदही हल्ली समाजमाध्यमांमध्ये आवडीने वाचले जातात. त्यामुळेच प्रमाण भाषेतल्या विरामचिन्हांचा ही उपयोग कसा आणि कुठे करायचा हे प्रत्येकाने शिकायला हवं. अशा गोष्टींना विरोध करून आपण काहीही साध्य करणार नाही. अत्यंत मूलभूत पातळीला असलेल्या, संस्कृतातून निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचं संगोपन करत करत, नवनवीन शब्दांचे आधार घेत आजची ही मराठी भाषा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. शास्त्रकारांनी नियम लावताना काहीतरी विचार निश्चितच केला असेल, नै? हे फार प्रकर्षाने आज इथे मांडण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा मला कार्यशाळेत आलेले अनुभव. लेखनाच्या राज्यभर कार्यशाळा घेत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जे बरे-वाईट अन

    24 min
  2. 03/21/2021

    #अक्षरभान- बोली कवतिके

    अक्षरभान…बोली कवतिके आमच्या समोर राहणारी तारण्या… वय वर्षे 3. हुशार,चुणचुणीत,चौकस...जन्माने तेलगू पण घरात सगळे मराठी बोलतात. ठाण्यात जन्माला येणारी तिची ही तिसरी पिढी. आज घडीला तिला मराठी, थोडी तेलुगू, टिव्हीमुळे हिंदी आणि शाळेत सुरुवात झाल्यामुळे इंग्लिश अशा चार भाषा छान बोलता येतात आणि समजतात. हळूहळू शाळेचा पगडा वाढत जाईल आणि इंग्रजी ही तिची विचार करण्याची भाषा बनेल. अन्य संवादासाठी राष्ट्रभाषा असेल पण, मराठी आणि तेलुगू मात्र हळूहळू तिच्या बोलण्यातून लुप्त होतील. हल्ली बहुतांश मुलांच्या भावविश्वाची भाषा हिंदी असते ( कार्टुनमुळे) आणि अभ्यासाचं माध्यम इंग्लिश (आई-बाबांच्या इंग्रजी प्रेमामुळे) त्यामुळे मग मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषांना ही मुलं पारखी होत जातात. आपली मातृभाषा किंवा बोली आपल्या मुलांनाही आली पाहिजे याकरता विशेष प्रयत्न करताना कुणी फारसे दिसत नाहीत. दोन मराठी आया एखाद्या दुकानात भेटल्या तर स्वतःच्या मुलांशी आणि एकमेकींशी इंग्रजीत बोलतात. आपण या पंजाबी किंवा गुजराती असतील का असा विचार करत असताना त्यांच्यापैकी कुणाचातरी फोन वाजतो आणि अस्खलित मराठीत त्या फोनवर बोलतात. निघताना 'बाय बाय' झाल्यावर 'बाय द वे' म्हणत अमुक पाटील आणि तमुक जोशी अशी नावं सांगतात. आपण अवाक होतो…. अनेकांशी माझा भाषा, भाषेची शुद्धता, व्याकरण, यावर अनेकदा वाद होतो. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. मी बोललेलं तुला कळलं म्हणजे भाषेचं कार्य साध्य झालं असा प्रतिवाद अनेकदा होतो. तो हेतू बरोबर असला तरी हजारो वर्षांच्या मंथनातून, स्वतःमध्ये काळानुसार बदल घडवत घडवत आजची भाषा आपल्याला दिसते. या जगात प्रत्येक गोष्टीमागे एक कार्यकारण भाव असतो...शास्त्र असतं. अगदी साधा दगड म्हटला तरी त्याच्या रचनेमागे एक शास्त्र आहे. तो तसा असण्याला अनेक कारणं आहेत. आणि भाषा तर अगदी जिवंत, नदीसारखी प्रवाही असते. खूप वळणं घेत, डोंगर दऱ्या पार करत भाषा आपला प्रवाह अविरत सुरू ठेवते. अर्थात, प्रवाह असायला पाणी मात्र गरजेचंच! पाणीच नसेल तर कोरडं पात्र केवळ भूतकाळाच्या स्मृती जपण्याच्या कामी येईल. त्यामुळे भाषा शुद्ध, प्रवाही आणि सशक्त ठेवायची असेल तर तिचा वापरही झालाच पाहिजे. खरं म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे. त्यावर नंतर कधीतरी बोलेन. आजचा मुद्दा आहे स्थानिक, प्रादेशिक आणि बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचा विचार करणं. आपण सध्या फक्त महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्राची मराठी ही राजभाषा. संस्कृतातून,प्राकृत, महाराष्ट्री असा प्रवास करत आजची मराठी भाषा आपल्या समोर आहे. जवळ जवळ 2600 वर्षांचा इतिहास असलेली आपली मराठी. प्रमाण मारक्तही तर सगळीकडे सारखी आहे पण मराठीच्या बोलीभाषा सुद्धा सर्वाधिक आहेत. भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे कितीतरी प्रकार आहेत. महाराष्ट्राच्या सीमा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा अशा राज्यांमध्ये विभागल्या गेलेल्या असल्याने त्या शेजारच्या भाषेचा प्रभाव तिथल्या परिसरातल्या मारक्तहीवर तर असतोच शिवाय बोलीभाषांचं प्रमाण या सीमावर्ती भागात जास्त आहे. त्याशिवाय सम्पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या विविध आदिवासी जमातींच्या बोलींची नजाकत काही औरच आहे. म्हणजे एकूणच महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे दोन्हीही बोली भाषांमुळे अतिशय श्रीमंत आहेत. प्रश्न आहे तो ही श्रीमंती टिकवण्याचा आणि वाढवण्याचा….. शालेय अभ्यासक्रमात असे प्रयत्न होताना दिसतात. आजकाल टीव्हीच्या माध्यमातूनही बोलीभाषा वापरण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. सोशल मीडियावर तर कोणालाही कोणत्याही नियमांचं बंधन नाही. दर बारा कोसांवर बदलणारी भाषा एक क्लिकच्या अंतरावर येऊन थांबली आहे. कोकणी, मालवणी, अहिराणी, वैदर्भी, वऱ्हाडी बोलींतून अनेक लोक काही ना काही सादर करत असतात. नगर पट्ट्यातल्या एक आज्जी तिकडच्या खास रेसिपी तिकडच्या बोलीभाषेत सांगतात, विदर्भातली निधी देशपांडे वऱ्हाडी ढंगाने 'सोटी पोरगी' सादर करते, मालवणी भाषेत 'रात्रीस खेळ चाले' सारख्या मालिकांचे सगळे संवाद सादर होतात….अहिराणी भाषेत सिनेमा होतो, मालेगावच्या भाषेत तर सिनेमा, सिरियल्स, नाटकं, व्हिडीओ, गाणी अशा कितीतरी संहिता तयार होतायात. माडिया गोंडी भाषेतली कविता माझ्या मुलीच्या पुस्तकात वाचली तेव्हा खरंच भरून आलं. अनेक वेगवेग

    12 min
  3. 02/27/2021

    सन्मान विज्ञान साहित्याचा

    अक्षरभान लेख क्र. 6 विज्ञानव्रती अध्यक्ष लहानपणी वाचनात फारसा रस नसलेल्या पण अत्यंत चौकस बुद्धी असलेल्या, 'प्रेषित' वाचायला सुरुवात केल्यावर झपाटून जाऊन संपूर्ण पुस्तक वाचूनच खाली ठेवणाऱ्या  माझ्या धाकट्या भावाची आठवण झाली. त्याचा तो उजळलेला चेहरा आणि चमचमणारे डोळे आजही मला स्पष्ट आठवतात. साहित्याचं एक नवीन दालन असलेल्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विज्ञान कथा ही कल्पनेची सैद्धांतिक आधार असलेली उत्तुंग भरारी आहे असं मला वाटतं.  आजकाल आपल्या समाजाला काय झालंय ते कधी कधी खरंच कळेनासं होतं…कोणीही कशाचाही विरोध करतो, कुठल्याही गोष्टीसाठी कोणालाही जबाबदार धरतो. एका बाबतीत एक न्याय, दुसरीकडे दुसराच….पार गोंधळलेल्या अवस्थेत माझ्यासारखे पामर दोन गटांचं तुंबळ यद्ध बघत बसतात. मुद्दा कोणताही असू द्या, लग्गेच दोन गट तयार होतात. तेही भाले, तलवारी, बंदुका अशी शस्त्रास्त्रं घरूनच…..मग युद्ध, युद्ध ना राहता चिखलफेक सुरू होते आणि दोन्ही गटातले लोक परस्परांना बरबटून टाकतात. युद्ध संपल्यावर मैदानात उरतात ते संस्कृती, इतक्या शतकांच्या उत्क्रांतीतून, मंथनातून वर आलेल्या संस्कार नावाच्या नवनीताचे, विखार, तिरस्कार आणि असूयेच्या आगीत वितळून वाहिलेले पाट…. आता, दोन आठवड्यांपूर्वीच सरस्वती पूजनावरून पुरस्कार नाकारणाऱ्या,  स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या आणि आधुनिक विचार करणाऱ्यांची पाठराखण करणारे लोक समाज माध्यमांतून प्रचंड सक्रिय झाले होते. मग आल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुका...पद्मभूषण डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर, मला वाटलं की त्या सगळ्या लोकांना खूप आनंद झाला असेल….चला, आधुनिक विचारांची धुरा खांद्यावर घेतलेला, विज्ञानव्रती मनुष्य अध्यक्ष झाला, त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल…..तर म्हणे, ते कुठे साहित्यिक आहेत? त्यांनी असं काय 'साहित्य' निर्माण केलंय?  आता मला सांगा, एका व्रतासारखा विज्ञान प्रसार आयुष्यभर करणं, त्यासाठी नवनवीन प्रयोग, उपक्रम करणं याबरोबरच मोलाचा वाटा जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथांचा आहे. हे काही ते आज करत असलेलं काम नाही. 1975 साली कराडला झालेल्या साहित्य संमेलनात त्या वर्षीच्या संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवतांनी जाहीरपणे जयंत नारळीकरांचा त्यांच्या नव्या दृष्टिकोनाबद्दल आणि साहित्यात एक नवीन प्रवाह खेळता केल्याबद्दल गौरव केला होता. म्हणजेच तोपर्यंत त्यांनी ह्या प्रवाहाला बऱ्यापैकी वाहतं केलं होतं. मुळात आपल्या भारतात साधारण 1900 च्या दरम्यान कृष्णाजी आठले यांनी ज्यूल व्हर्नच्या कादंबरीचा 'चांद्रलोकची सफर' असा अनुवाद केला. त्यानंतर जवळजवळ 11 वर्षांनी म्हणजे 1911 मध्ये श्रीधर रानडे यांनी पहिली मराठी विज्ञानकथा ' तारेचे रहस्य' ही स्वतः लिहिली. त्यानंतरही वा. म. जोशी यांच्या दोन कथा 1914 मध्ये प्रकाशित झाल्या. त्यानंतर परत मोठा खंड पडला आणि स्वातंत्र्यलढ्याने देश ढवळून निघाला.. त्याकाळात परत विज्ञानकथा प्रवाह खंडितच झाला होता. 1950 नंतर पुन्हा एकदा हा प्रवाह भा.रा. भागवत, दि. बा.मोकाशी , यशवंत रांजणकर, खांबेटे, नारायण धारप, निरंजन घाटे यांनी अनुवादित किंवा स्वनिर्मित विज्ञानकथांतून  जिवंत ठेवला.  आगदी अलीकडच्या काळात बाळ फोंडके, सुबोध जावडेकर लक्ष्मण लोंढे, माधुरी शानभाग, शुभदा गोगटे, अरुण साधू, अरुण मांडे यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण शैली तयार करत विज्ञान कथांमध्ये खूप मोलाची भर घातलीय.  मुळात, विज्ञानकथा हा प्रकारच असा आहे ज्यात आशय ललित च्या अंगाने जात असला तरी आजूबाजूला झालेली भौतिक, तंत्रज्ञानाची  प्रगती त्यातून प्रमुखपणे डोकावत राहते आणि त्याचा भविष्यात मानवी नातेसंबंधांवर, सामाजिक स्थितीवर होणारा परिणाम लेखक कल्पकतेने मांडत असतो. त्यामुळे कल्पकतेला प्रचंड वाव तरीही त्याला विज्ञानाचं अधिष्ठान असलेला हा साहित्याचा फार आकर्षक प्रकार मला वाटतो. जयंत नारळीकरांनी ह्या प्रकाराला मान्यता मिळवून दिली आहे. त्यांचं विज्ञान आणि एकूणच सगळ्या क्षेत्रांतील काम, उंची यासाठी त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण म्हणून गौरवण्यात आलंय. साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांच्या लेखक म्हणून आवश्यक असलेल्या मान्यतेची ग्वाही देतो.त्यामुळे माझ्यासारख्या साहित्य रसिकांना अत्यंत आनंद झाला आहे.  नाशिक हे एकेकाळचं धर्मपीठ. तिथे होणाऱ्या अक्षरोत्सवाचे प्रमुख एक विज्ञानव्रती व्हावेत हा एक फार चांगला योग आहे. जयंत नारळीकर त्यांच्या सबंध आयुष्यभर विज्ञानाचा प्रसार, अंधश्रद्धांच्या निर्मूलनाच काम करत आले

    11 min
  4. 02/25/2021

    लुप्त तारे भाग२

    अक्षर भान या सदरातला हा आजचा पाचवा लेख. सदर सुरू करताना, साहित्याशी संबंधित घटना किंवा साहित्याची संबंधित असलेल्या विषयांवरती भाष्य करावं असा विचार जरी केला असला तरी, प्रसंगी काही विषयांवर व्यक्त होण्यास शिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे या सदरातून वेगवेगळ्या गोष्टीतलं हरवत चाललेलं भान जपण्याचा दर रविवारी आपण प्रयत्न करणार आहोत. सध्याचा साहित्य विश्वातला गाजत असलेला विषय मांडण्याचा प्रयत्न केला. दरी मिटवायची की दरी वाढवायची हे सगळ्या लोकांच्या हातात आहे. त्यामुळे सामंजस्याची भूमिका घेणारा मार्ग जेव्हा स्वीकारला जाईल तेव्हा गट उरणार नाहीत आणि तू नि मी एक ही भावना आणि संतांनी अपेक्षा केली त्याप्रमाणे चांगलं निर्मळ वातावरण निर्माण होईल. या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत. लेखावर प्रतिक्रिया देताना अनेक दिग्गज लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे असं दिसतंय. तर या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जाहीर झालेले साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय डॉक्टर जयंत नारळीकर यांना मन:पूर्वक अभिनंदन !! साहित्यात येणारे अनेक प्रवाह साहित्याला वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागणारे, त्यात ग्रामीण साहित्य, विद्रोही साहित्य, स्त्रीवादी साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारात अस्तित्वात असताना एक वेगळा वैश्विक आणि भविष्याकडे जाणारा विचार देणारं विज्ञान साहित्य निर्माण करणे त्या काळाची गरज होती. काल्पनिक विश्वात रमता रमता विज्ञानाला त्यात स्थान देऊन, विज्ञान आपल्याला कुठे घेऊन जाईल याची एक झलक आपल्या लेखनातून दाखवणारे नारळीकर संमेलनाचे अध्यक्ष असतील हा मराठी सारस्वतांचा आणि मराठी साहित्याचा गौरवच आहे. अशा वेगळ्या वाटा चोखाळणारे विज्ञाननिष्ठ लेखक अध्यक्ष असताना येत्या वर्षभरात साहित्याच्या क्षेत्रातही एक वेगळा विचार चांगला विचार रुजवतील अशी अपेक्षा करू या. संमेलन हा केवळ उत्सव न राहता साहित्यातले वेगवेगळे मार्ग वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या प्रणाली यांना एकत्रित आणणारा, समजून घेणारा, त्यावर साधक-बाधक चर्चा करणारा असा एक मंच तयार झाला पाहिजे ही सामान्य रसिकाची अपेक्षा जयंत नारळीकरांच्या निवडीतून नक्कीच सार्थ ठरेल आणि त्या दिशेने आपलं मराठी साहित्य संमेलन वेगळे पायंडे ही पडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अक्षरभानच्या तिसऱ्या लेखात मी 'लुप्त तारे' हा मराठी साहित्यातल्या लुप्त झालेल्या ताऱ्यांबद्दल थोडी माहिती देणारा लेख लिहिला होता. आपल्या प्रदीर्घ आयुष्याच्या प्रदीर्घ सेवेतून मराठी साहित्य रसिकांसाठी दर्जेदार लेखन करणाऱ्या आणि त्या लेखनातून एक विचार देणाऱ्या अशा काही ताऱ्यांचा उल्लेख मी केला होता. पण याच साहित्याच्या क्षितिजावर काही तारे असेही आहेत, जे अचानक अपघाताने अकाली लुप्त झाले. हे तारे मराठी साहित्यात अधिक काळ तळपले असते तर मराठी साहित्याला एक नवी आभा प्रभा मिळू शकली असती हे निश्चित. अत्यंत कमी वयात मरण पावलेले बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा ही आपल्याला विसर पडता कामा नये. निसर्गाला आपल्या शब्दरूपात पकडून साहित्य रसिकांच्या समोर उधळून देणारा हा कवी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथं अपघाताने मृत्युमुखी पडला. 'ती फुलराणी, आनंदी आनंद गडे श्रावणमास, औदुंबर' या कवितांनी आजही रसिकांवर तेवढीच भुरळ घातलेली आहे. अतिशय साधे शब्द, अतिशय रंजक विचार, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे शब्द आणि शब्दा शब्दात भरलेला निसर्ग हे बालकवींच्या कवितेचं खास वैशिष्ट्य होतं. उणीपुरी दहा वर्षांची कारकीर्द असलेल्या या कवीचं अकाली निधन हे मराठी रसिकांना फार मोठा चटका लावून गेलं आणि त्यामुळेच अनेक सुंदर अर्थपूर्ण निसर्ग कवितांना महाराष्ट्र मुकला असंच म्हणावं लागेल. असेच अपघाताने अकाली आपल्याला, 'गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे' असं म्हणत रसिकांना पोरकं करून गेलेले आरती प्रभू हे सुद्धा साहित्याच्या क्षितिजावर नुकतेच चमकू लागले असताना लुप्त झालेले तारे आहेत. आरती प्रभू असं वेगळंच नाव धारण करून वेंगुर्ल्याच्या चिंतामणी त्र्यंबक खानोलकर या युवकाची वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजे 1954 साली कविता आणि कथा शून्य शृंगारते ही त्यांची पहिली 'आरती प्रभू' या नावाने प्रसिद्ध झालेली कविता होती. आरती प्रभू या नावाचीही एक गंमत आहे. शालेय वार्षिकात ते 'पुष्पकुमार' या नावाने लिहीत असत. पण नंतर गाव सोडून मुंबईला गेल्यावर त्यांच्या प्रभू-खानोलकर या आडनावातलं प्रभू आ

    13 min
  5. 02/23/2021

    विखारप्रणाली

    *विखारप्रणाली* गेल्या आठवड्यात मराठी साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठी खळबळ उडाली. विदर्भातली मोठी संस्था असणाऱ्या 'विदर्भ साहित्य संघ' या संस्थेने ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांना 'जीवनव्रती' हा पुरस्कार घोषित केला. त्याला मनोहरांनी अनुमती दिली पण पुरस्कार वितरणाच्या दिवशी मात्र या ज्येष्ठ साहित्यिकांनी 'पुरस्काराच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा आहे म्हणून मी पुरस्कार स्वीकारू शकत नाही कारण मी सरस्वती मानत नाही.' अशा प्रकारचे स्पष्टीकरण देऊन पुरस्कार स्वीकारला नाही. त्यावर साहित्य संघाने त्यांचं स्पष्टीकरण दिलं. इथे विषय खरं तर संपायला हवा होता. माध्यमं आणि समाजमाध्यमातून दोन्हींच्या विरोधात आणि समर्थनार्थ तुंबळ वाक् युद्ध सुरू झालं. विषय घसरत घसरत हिंदुत्व, राजकारण, जातीयवाद, आंबेडकर, फुले, ब्राह्मण, अत्याचार शोषण असं करता करता एकमेकांची आय-माय काढण्यापर्यंत घसरला; आणि वेगवेगळ्या रंगांचे आणि चिन्हांचे झेंडे या साहित्याच्या आकाशात नंगा नाच करू लागले. त्यात माझ्यासारख्या असंख्य अक्षर वारकऱ्यांची अवस्था पार गुदमरल्यासारखी झाली. अरविंद जगताप यांचं 'जगण्याच्या वारीत मिळेना वाट, दाटले मोहाचे धुके घनदाट, आपली माणसं आपलीच माती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठलाssss कोणता झेंडा घेऊ हाती' हे गीत अशा परिस्थितीत मला सारखं सारखं आठवत राहिलं. मनोहरांचं 'व्यक्तिस्वातंत्र्य' मान्यच आहे पण त्याचवेळी विदर्भ साहित्य संघाचं 'धारणा स्वातंत्र्यही' मान्य आहेच!! आणि ते सगळ्यांनीच मान्य करायला पाहिजे, हेच आपली संस्कृती,धर्म,संस्कार, तत्त्वज्ञान वारंवार सांगायचा प्रयत्न करतात. आणि युगानुयुगं हे प्रयत्न सुरू आहेत. महर्षी व्यासांपासून बा. भ. बोरकर आणि अगदी आमच्या पिढीतलेही काही कवी हे सांगण्याचा प्रयत्न करतात. बोरकरांची 'प्रतिएक झाडामाडा त्याची त्याची रूपकळा प्रतिएक पनाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' ही कविता असो किंवा 'मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो' या कविता आपल्याला काय सांगतात?... हे आपण वाचतो, त्यांचा आस्वाद घेतो, टाळ्या वाजवतो मग ते स्वीकारू किंवा आचरणात का आणू शकत नाही? समाजामध्ये ही दुफळी कायम का दिसते? संतांनी आपलं सारं आयुष्य ही दुही मिटवण्यात खर्ची घातलं. विचारवंत (खरे) आजही प्रयत्न करतायत. तरी ही दरी वाढत चालल्याची चिन्ह वेळोवेळी का दिसून येतात? का आपण दुसऱ्याचंही स्वातंत्र्य मान्य करू शकत नाही? हिंदु धर्माला नावं ठेवणे हा एकमेव अजेंडा अनेक तथाकथित विचारवंतांच्या लेखनात, बोलण्यात, वागण्यात का दिसून येतो? हिंदू धर्मातल्या सगळ्याच गोष्टी वाईट असून त्यांना झिडकारलं पाहिजे, अशा प्रकारचे विचार वेळोवेळी विद्रोही लोक व्यक्त करताना दिसतात . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतराचा निर्णयही त्यावेळच्या समाजाने मोठ्या मनाने मान्य केला. वेगवेगळी स्थित्यंतरं त्यानंतर समाजामध्ये दिसून आली. स्पष्टपणे म्हणायचं झालं तर आजच्या घडीला सामाजिक दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने सगळे समान पातळीला आहेत. अधिकच स्पष्ट बोलायचं झालं तर आर्थिक स्थिती ही समाजातलं अंतर वाढवणारी एकमेव गोष्ट आहे आज. खरंतर 'लुप्त तारे' या माझा लेखाचा दुसरा भाग लिहिण्याचं मी ठरवलं होतं. जे तारे साहित्याच्या नभांगणात आपली अक्षय मुद्रा उमटवून गेले, आपले ठाम विचार रसिकांच्या समोर त्यांनी मांडले. एक विचार देऊन समाजाची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला, समाजातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एक वळण लावण्याचा प्रयत्न केला. काळाच्या ओघात क्षितिजावर कुठेतरी ते लुप्त झाले. त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करणं हे या लेखाचं प्रयोजन होतं. पण त्यांचं स्मरण करत असताना पुन्हा एकदा वादळ निर्माण करणाऱ्या अनेक घटना साहित्यक्षेत्रात होताना दिसतात, समाजात घडताना दिसतात आणि मग मन खट्टू होतं. शेकडो संस्था, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो कायदे आणि नियम एवढं करूनही आपला समाज दोन फळ्यामध्ये विभागलेला का आहे? या विचाराने मन अस्वस्थ होतं. आणि म्हणूनच थोडा विषय बदल करून लिहावं लागतंय. वेगळा विचार मांडणे म्हणजे विखार ओकण्यासारखं आहे का? माझ्या एका मित्राने त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारची वादळ उठणं कसं चुकीचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अतिशय गलिच्छ भाषेमध्ये त्याच्यावर टीका केली गेली. त्याने 'विचार प्रणाली' आणि 'विखार प्रणाली' अशा दोन शब्दांचा वापर केला. खरोखर पदोपदी हे जाणवत राहतं की समाजातले 90% लोक जेव्हा सामंजस्याने, एकोप्य

    11 min
  6. 02/22/2021

    लुप्त तारे

    *लुप्त तारे* मराठी सारस्वताच्या नभांगणात असंख्य तारे युगानयुगं चमकतायेत. तारेही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही लखलखणारे, काही लुकलुकणारे, काही मिणमिणते, काही निस्तेज तर काही कालौघात वेळेआधीच लुप्त होणारे. मराठी साहित्याचं नभांगणही अशा असंख्य वेगवेगळ्या तारे तारकांनी प्रकाशमान आहे. त्यात प्रदीर्घ आयुष्य आणि साहित्यिक जीवन लाभलेले साहित्यिक, काही उशीराने उदयास आले पण नंतर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत प्रदीर्घ काळ साहित्यशारदेची सेवा करणारे, तर काही उदयाच्या क्षितिजावर नुकतेच चमकू लागलेले परंतु काळाच्या मगरमिठीत लुप्त झआलेले असे अनेक अक्षरनंदन आहेत. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, इंदिरा संत, दुर्गाबाई भागवत, मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे, शांता शेळके, विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, श्री. ना. पेंडसे हे साहित्यिक दीर्घायुषी होते. साधारण ८०-९० वर्षांचं आयुष्य आणि ५० ते ६० वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा त्यांनी अक्षरांची केली. या काळात स्वत:चा असा एक वाचकवर्ग तयार केला, शैली विकसित केली, आणि विविध साहित्य प्रकारांत विपुल लिखाण केलं. दीर्घकाळ वाचकांशी समरसून आपलं लेखन त्यांच्यासमोर ठेवताना ते एक विचार वाचकांना देऊ शकले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्ग दाखवेल असं साहित्य त्यांनी निर्माण केलं. त्यामुळे अशा साहित्यिकांचं एकेक युग म्हणता येईल, इतकं त्यांनी आपल्याला दिलं. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा वरदहस्त मराठी वाचकांच्या माथ्यावर जवळपास पाच दशकं फिरत राहिला. ८७ वर्षांच्या समृद्ध जीवनात कुसुमाग्रजांनी विपुल लेखन केलं. प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक अशा विविध रुपांत ते रसिकांच्या समोर येत राहिले. साहित्यिकाला सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, हा विचार त्यांनी सदैव आचरणात आणला होता. त्यामुळेच कुसुमाग्रजांची कविता ही क्रांतीची कविता आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत त्यांची कविता धुक्यातून वाट दाखवित राहिली. १९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिरात झालेल्या सत्याग्रहात ते सक्रिय सहभागी झाले, आणि त्यांची कविता ही क्रांतीची कविता झाली. ‘ते सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न आहेत’, असं म्हटलं जातं ते उगीच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४२च्या लढ्याच्या दरम्यान लिहिली गेलेली ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ ही कविता त्यावेळी राजबंदी असलेल्या क्रांतिकारकांच्या मनातला हुंकार होता. सगळ्याच टीकाकारांनी जिला गौरवलं अशी ही कविता त्यावेळी राजकीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तर एखाद्या स्तोत्रासारखी पाठ केली होती. ती कविता संध्याकाळच्या एकत्रिकरणात सगळेच स्वातंत्र्यसैनिक तरुंगात सामूहिकरित्या म्हणत, अशी आठवण ना. ग. गोरे यांनी सांगितली आहे. बा. भ. बोरकरांनी या क्रांतिगीताचा पोर्तुगीज भाषेत अनुवाद केला आणि त्यांच्या मातृतुल्य असलेल्या एका पोर्तुगीज वृद्धेला जेव्हा ऐकवला तेव्हा तिने दिलेली ‘ही कविता फ्रेंच राष्ट्रगीताहूनही श्रेष्ठ आहे’ ही दाद त्या कवितेचं स्थान अधिक दृढ करते. त्यानंतर ‘कणा’ ही कविता प्रचंड लोकप्रिय झाली. जगायला काय लागतं, याचं साधं उत्तर एका प्रसंगातून ही कविता देऊन जाते आणि वाचकाच्या मनाला हात घालते. हाच ऋषितुल्य कवी जेव्हा स्वातंत्र्याला ५० वर्षे लोटल्यानंतर देशाची, लोकांची, समाजाची पतीत अवस्था बघतो तेव्हा व्यथित होऊन ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ लिहून भावात्मकतेने लोकांची कानउघाडणी करतो. खरोखर थोर, अलौकिक आणि लोकोत्तर विभूती म्हणता येतील असे अनेक साहित्यिक मराठीला मिळाले. मंगेश पाडगावकरांच्या कविता अशाच चुकलेल्यांना रस्ता दाखवणाऱ्या, रुसलेल्याला हसते करणाऱ्या आणि कठीण तत्वज्ञान सोपं करुन सांगणाऱ्या आहेत, असं मला वाटतं. या कवितांनी माझ्यासारख्या कित्येकांना जगण्याची दिशा, चालण्याचं बळ आणि स्वप्नांची उर्मी दिली असेल. महाविद्यालयात असताना, आवडत्या कविता एका डायरीत लिहिण्याचा मला छंद होता. मर्ढेकर, बोरकर, इंदिरा संत, सुर्वे, शांता शेळके, आरती प्रभू, पाडगावकर अशा कितीतरी कवींच्या कविता माझ्या हस्ताक्षरात लिहिण्यात मला विलक्षण आनंद व्हायचा. ती कविता मनाच्या अधिक जवळ जायची. असंच एकदा मी ‘बोलगाणी’ वाचता वाचता दोन-तीन कविता लिहून झाल्या आणि पुस्तक आधी पूर्ण करु आणि मग लिहू असा विचार मनात आला. शेवटी असं वाटलं की, अरे सगळं पुस्तकच संग्रही असायला हवंय. इतकी श्रीमंती या कवितांनी दिली. पाडगावकर वाचणं जसं सुखद असायचं तसंच त्यांना ऐक

    11 min

About

जगताना आवश्यक असलेल्या दृष्टिकोनाला एक पूरक कोण देण्याचा प्रयत्न. जगण्याच्या सोहळ्याला एक 'अक्षर'भान यावं म्हणून....