अक्षरभान…बोली कवतिके आमच्या समोर राहणारी तारण्या… वय वर्षे 3. हुशार,चुणचुणीत,चौकस...जन्माने तेलगू पण घरात सगळे मराठी बोलतात. ठाण्यात जन्माला येणारी तिची ही तिसरी पिढी. आज घडीला तिला मराठी, थोडी तेलुगू, टिव्हीमुळे हिंदी आणि शाळेत सुरुवात झाल्यामुळे इंग्लिश अशा चार भाषा छान बोलता येतात आणि समजतात. हळूहळू शाळेचा पगडा वाढत जाईल आणि इंग्रजी ही तिची विचार करण्याची भाषा बनेल. अन्य संवादासाठी राष्ट्रभाषा असेल पण, मराठी आणि तेलुगू मात्र हळूहळू तिच्या बोलण्यातून लुप्त होतील. हल्ली बहुतांश मुलांच्या भावविश्वाची भाषा हिंदी असते ( कार्टुनमुळे) आणि अभ्यासाचं माध्यम इंग्लिश (आई-बाबांच्या इंग्रजी प्रेमामुळे) त्यामुळे मग मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषांना ही मुलं पारखी होत जातात. आपली मातृभाषा किंवा बोली आपल्या मुलांनाही आली पाहिजे याकरता विशेष प्रयत्न करताना कुणी फारसे दिसत नाहीत. दोन मराठी आया एखाद्या दुकानात भेटल्या तर स्वतःच्या मुलांशी आणि एकमेकींशी इंग्रजीत बोलतात. आपण या पंजाबी किंवा गुजराती असतील का असा विचार करत असताना त्यांच्यापैकी कुणाचातरी फोन वाजतो आणि अस्खलित मराठीत त्या फोनवर बोलतात. निघताना 'बाय बाय' झाल्यावर 'बाय द वे' म्हणत अमुक पाटील आणि तमुक जोशी अशी नावं सांगतात. आपण अवाक होतो…. अनेकांशी माझा भाषा, भाषेची शुद्धता, व्याकरण, यावर अनेकदा वाद होतो. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. मी बोललेलं तुला कळलं म्हणजे भाषेचं कार्य साध्य झालं असा प्रतिवाद अनेकदा होतो. तो हेतू बरोबर असला तरी हजारो वर्षांच्या मंथनातून, स्वतःमध्ये काळानुसार बदल घडवत घडवत आजची भाषा आपल्याला दिसते. या जगात प्रत्येक गोष्टीमागे एक कार्यकारण भाव असतो...शास्त्र असतं. अगदी साधा दगड म्हटला तरी त्याच्या रचनेमागे एक शास्त्र आहे. तो तसा असण्याला अनेक कारणं आहेत. आणि भाषा तर अगदी जिवंत, नदीसारखी प्रवाही असते. खूप वळणं घेत, डोंगर दऱ्या पार करत भाषा आपला प्रवाह अविरत सुरू ठेवते. अर्थात, प्रवाह असायला पाणी मात्र गरजेचंच! पाणीच नसेल तर कोरडं पात्र केवळ भूतकाळाच्या स्मृती जपण्याच्या कामी येईल. त्यामुळे भाषा शुद्ध, प्रवाही आणि सशक्त ठेवायची असेल तर तिचा वापरही झालाच पाहिजे. खरं म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे. त्यावर नंतर कधीतरी बोलेन. आजचा मुद्दा आहे स्थानिक, प्रादेशिक आणि बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचा विचार करणं. आपण सध्या फक्त महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्राची मराठी ही राजभाषा. संस्कृतातून,प्राकृत, महाराष्ट्री असा प्रवास करत आजची मराठी भाषा आपल्या समोर आहे. जवळ जवळ 2600 वर्षांचा इतिहास असलेली आपली मराठी. प्रमाण मारक्तही तर सगळीकडे सारखी आहे पण मराठीच्या बोलीभाषा सुद्धा सर्वाधिक आहेत. भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे कितीतरी प्रकार आहेत. महाराष्ट्राच्या सीमा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा अशा राज्यांमध्ये विभागल्या गेलेल्या असल्याने त्या शेजारच्या भाषेचा प्रभाव तिथल्या परिसरातल्या मारक्तहीवर तर असतोच शिवाय बोलीभाषांचं प्रमाण या सीमावर्ती भागात जास्त आहे. त्याशिवाय सम्पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या विविध आदिवासी जमातींच्या बोलींची नजाकत काही औरच आहे. म्हणजे एकूणच महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे दोन्हीही बोली भाषांमुळे अतिशय श्रीमंत आहेत. प्रश्न आहे तो ही श्रीमंती टिकवण्याचा आणि वाढवण्याचा….. शालेय अभ्यासक्रमात असे प्रयत्न होताना दिसतात. आजकाल टीव्हीच्या माध्यमातूनही बोलीभाषा वापरण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. सोशल मीडियावर तर कोणालाही कोणत्याही नियमांचं बंधन नाही. दर बारा कोसांवर बदलणारी भाषा एक क्लिकच्या अंतरावर येऊन थांबली आहे. कोकणी, मालवणी, अहिराणी, वैदर्भी, वऱ्हाडी बोलींतून अनेक लोक काही ना काही सादर करत असतात. नगर पट्ट्यातल्या एक आज्जी तिकडच्या खास रेसिपी तिकडच्या बोलीभाषेत सांगतात, विदर्भातली निधी देशपांडे वऱ्हाडी ढंगाने 'सोटी पोरगी' सादर करते, मालवणी भाषेत 'रात्रीस खेळ चाले' सारख्या मालिकांचे सगळे संवाद सादर होतात….अहिराणी भाषेत सिनेमा होतो, मालेगावच्या भाषेत तर सिनेमा, सिरियल्स, नाटकं, व्हिडीओ, गाणी अशा कितीतरी संहिता तयार होतायात. माडिया गोंडी भाषेतली कविता माझ्या मुलीच्या पुस्तकात वाचली तेव्हा खरंच भरून आलं. अनेक वेगवेग